मुक्तपीठ टीम
नव वर्ष म्हटलं की धमाल. वाट्टेल तसं सेलिब्रेशन. असं अनेकांना वाटतं. पण समाजातील एक मोठा वर्ग आजही संयम आणि शिस्तीनं बरंच काही चांगलं करत असतो. नुकत्याच सुरु झालेल्या २०२२च्या स्वागतासाठी ठाणे जिल्ह्यातील शंभुदुर्ग प्रतिष्ठान या संस्थेने असाच एक चांगला उपक्रम राबवला. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी शहापुर तालुक्यातील माहुली किल्ल्यावर दोन दिवसीय दुर्गसंवर्धन मोहिमेचं आयोजन करण्यात आलं. या मोहिमेत ठाणे जिल्ह्यातील ६५ गावांमधील १२० सदस्य सहभागी झाले. या मोहिमेत गडावर सुरक्षित रस्ते, ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता, कठीण चढाईच्या ठिकाणी लोखंडी शिडी लाऊन गडाचे संवर्धन केले. अर्थातच यानंतर भगवा झेंडाही फडकवण्यात आला.
माहुली गडावर शिवगर्भ संस्कार झाल्याचा इतिहास सांगितला जातो. तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच गड असल्याने या गडावर दर्शनासाठी मुंबई व महाराष्ट्रातून शेकडो शिवप्रेमी नेहमी ये जा करत असतात. शासकीय सुविधांनी वंचित असलेल्या या गडावर पर्यटकांना नेहमी अनेक संकटांचा सतत सामना करावा लागतो. गडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी शासन जरी काही सुविधा देत नाही. मात्र, ते आपले कर्तव्य मानत शंभुदुर्ग प्रतिष्ठानचे संस्थापक – आदेश चौधरी, कार्याध्यक्ष – चंद्रकांत चंदे, महासचिव – संजय चौधरी, खजिनदार – विलास जाधव यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी या गडावर गडसंवर्धन मोहिमेचे आयोजन केले जाते. त्याद्वारे अनेक गड संवर्धनाची कामे करण्याचा प्रयत्न केला जातो.