मुक्तपीठ टीम
“साहित्याच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडते. साहित्यात स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांसह विचारांचे वास्तव आणि शब्दांचे वैभवही असते. बंधुतेचा धागा समाजाला बांधण्याचे काम करतो. त्यात माणसांना जोडण्याची आणि माणूस म्हणून घडविण्याची ताकद असते,” असे प्रतिपादन माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी यांच्या संयुक्तपणे भोसरी येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालयातील भगवान महावीर सभागृहात आयोजिलेल्या बाविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या समारोपात प्रा. ढोबळे बोलत होते. यावेळी प्रा. ढोबळे व वंचित विकास संस्थेला ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रा. ढोबळे यांनी पुरस्काराच्या रकमेत पाच हजारांची भर घालून वंचित विकास संस्थेला दहा हजारांची देणगी दिली.
यावेळी राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी चंद्रकांत वानखेडे, स्वागताध्यक्ष डॉ. अशोक कुमार पगारिया, परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रकाश जवळकर, वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, निमंत्रक रामदास जैद व प्राचार्य सदाशिव कांबळे, प्रशांत रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. साने गुरुजी मुल्यजागर पुरस्कारांचेही वितरण यावेळी झाले.
प्रा. लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, “विचारांचे वास्तव आणि शब्दांचे वैभव जपल्यास समाजात सामाजिक परिवर्तन घडेल. समाजातील वेदनेचा हुंकार कागदावर उतरला पाहिजे. कविता जिवंत आणि सकस असावी. सामर्थ्यशाली लिखाणातुन लेखकांनी क्रांती घडवली, याचा इतिहासही साक्षीदार आहे. सध्या वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे. त्यामुळे साहित्याचे गांभीर्य लक्षात घेत मराठीचे वैभव आता साहित्यिकांनी वाढवले पाहिजे.”
प्रकाश रोकडे म्हणाले, “बंधुतेचा व मानवतेचा विचार जगत असलेल्या प्रा. ढोबळे आणि वंचित विकास संस्थेला बंधुता पुरस्काराने सन्मानित करताना आनंद होत आहे. हे व्यासपीठ यापुढेही समाजात बंधुतेचा विचार पेरण्यासाठी तत्पर आहे.”
विजयकुमार मर्लेचा म्हणाले, “आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण केलेल्या विलास चाफेकर यांचा हा सन्मान आहे. त्यांच्या प्रेरणेतूनच सामाजिक विचारांचा वसा जोपासत वंचित विकास संस्था वंचितांसाठी कार्यरत आहे.”
शंकर आथरे यांनी सुत्रसंचालन केले. सदाशिव कांबळे यांनी आभार व्यक्त केले.