तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ – सरळस्पष्ट
मी एक सामान्य पत्रकार. पण त्याआधी एक सामान्य माणूस. कामासाठी रोज प्रवास करतो. मिळेल त्या साधनाने. मुंबईत प्रवासात अर्ध्याअधिक प्रवाशी महिला असतात. एसटीच्या भाडेसवलतीनंतर तर ग्रामीण भागातही स्त्री प्रवाशी जास्तच वाढल्यात. असाच प्रवास करणाऱ्या एका स्त्रीवर पुण्याच्या स्वारगेटला एसटी बसमध्ये बलात्कार झाला. मन हादरून गेलं. हा महाराष्ट्रच ना! तेवढ्यात महाराष्ट्राचे मंत्री योगेश कदम जे बोललेत तेव्हापासून तर मनात संतापाचा भडका उडालाय. ते म्हणालेत, “परवाच्या दिवशी जी घटना घडली, ती घटना कुठल्याही फोर्सफुली, तिथं कुठलाही स्ट्रगल, अथवा असं तिथं कुठलंही न झाल्यामुळे…जेव्हा ही घटना घडली तेव्हाही तिथंदेखील जवळपास दहा ते पंधरा लोक बसच्या आजूबाजूला उपस्थित होते. आणि कुणालाही कुठे शंका आली नाही. त्यामुळे त्याला कदाचित ते क्राइम सुरळीतपणे करता आले. आरोपी आपल्या ताब्यात येईल तेव्हा सर्व गोष्टी लक्षात येतील.”
म्हणे परवा झालेला बलात्कार हा फोर्सफुली नव्हता. संघर्षही झाला नाही. जसे यांना त्या नराधमानं विश्वासानं सांगितलं. सर्वात डोक्यात जाणारा प्रकार म्हणजे, यात मंत्रीमहोदय कुठेही बलात्कार हा शब्द वापरत नाहीत. त्यामुळेच मनात उडालेला संतापाच्या भडक्याच्या काही ठिणग्या तरी त्यांच्यासमोर मांडणं आवश्यक वाटतं. खरंतर मनात उफाळलेला लाव्हा त्यापेक्षाही ज्वालाग्राही आहे.
मुंबईत, मुंबईबाहेर कधी कार, कधी रेल्वे, कधी बस, कधी कॅब, कधी रिक्षा प्रवास सुरुच असतो. चांगली माणसं भेटतात. स्त्री नातेवाईक, स्त्री सहकारी यांच्याशी बोलताना त्यांची प्रवास काळजी लक्षात येते. अनेकदा तर रात्री अपरात्री किंवा पहाटे प्रवास करणाऱ्या अशा सहकाऱ्यांना प्रवास करताना गुगल मॅप ट्रॅव्हल रुट शेअर करण्याचा सल्ला देतो. किमान त्यांचं लोकेशन, प्रवास कळत राहतो. घरचे निश्चिंत असतात. अशा सहकारी अनेकदा मन मोकळं करतात. तेव्हा कळतं खूप काही. त्यांची प्रवासात काहीजण काळजी घेतात. तर वखवखलेल्या नजराही पाठलाग करतात. अगदी अंगाचे नजरेनेच लचके तोडावे, तशाही अधाशीपणे काही पाहतात. हे प्रवासातच असं नाही. सगळीकडेच. पण प्रवासात गर्दीला चेहरे नसतात. तिथं निर्ढावलंपण वाढतं. आता तर सभोतालीही मुखवटे घालून प्रत्यक्षात सडलेली मनं घेऊन फिरणारे अनेक विकृत वावरतात. प्रवासात जास्तच.
त्यामुळेच माननीय नामदार गृहराज्यमंत्री योगेश कदमसाहेब एकदा प्रवास कराच तुम्ही रेल्वेने. बसने. कॅबने. रिक्षाने. रात्री अपरात्री. पहाटे. दुपारी. असुरक्षित हार्बर रेल्वेने तर कराच करा. अट एकच सरकारी सुरक्षा बाजूला ठेवा. कळेल तुम्हाला महिलांचाच नाही आमच्यासारख्यांचा प्रवास किती आणि कसा सुरक्षित असतो ते. आमची मुंबई खूप सुरक्षित. मुंबई माझी लाडकीच पण आता भीतीही वाटतेच. महिलांना तर जास्त. महिला सांगतात, महाराष्ट्रही आता सुरक्षित वाटत नाही. शेवटी नराधम इथंही घिरट्या घालतात. संधी साधतात.
कदमसाहेब, स्त्रीला कुठेही सुरक्षित वाटत नाही. हे वास्तव एसी SUV, आलिशान कारमधून, कडकोट सुरक्षेत फिरणाऱ्या तुमच्यासारख्यांना कळणार तरी कसं?
काय म्हणालात तुम्ही? तुम्ही मोठे आहात. मी एक सामान्य पत्रकार. नाही थेट मनात भडकलेली संतापाची आग आहे तशी मांडू शकत. नियम पाळावे लागतात. त्यामुळे तुमचं बोलणं ऐकून मलाच लाज वाटली, असं मी उलटं म्हणतो. तुमची लाज नाही काढत. मी मराठी. तुम्हीही मराठी. तुम्ही तरुण आहात. नोकरशाहीच्या ब्रिफिंगच्या आधारे बोलला असाल. पण कानाने ऐकताना ते मेंदूत जावू द्या, मन आणि मेंदूची सांगड घातल्यानंतर तोंडाने बाहेर येऊ द्या.
आपण मराठी माणसं, काय आपलं भारी? आपण छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वस्व मानतो. काय केलेलं त्यांनी रांझ्याच्या पाटलाचं? विसरलात तर सांगतो. त्यांनी चौरंग केलेला त्या नराधमाचा. हिंमत झाली नसेल त्याची पुन्हा कोणत्या स्त्रीकडे वाकड्या नजरेनं पाहण्याचीही. मग वावगं वागणं तर दूरच. तसं ठेवलंच नव्हतं. आणि तुम्ही रांझाच्या पाटलाच्या पुण्यातील अवलादीला…त्या दत्ता आडेकरला अप्रत्यक्ष समर्थन करता. होय, अप्रत्यक्ष समर्थनच. प्रतिकार, संघर्ष नाही म्हणजे आणखी काय!
अहो महाराजांना तरी आठवायचं! तो क्रूरकर्मा औरंग्या, अफझलखान किंवा परक्यांच्या कोणत्याही फौजांवर त्यांचा राग धर्मामुळे नाही तर मायभगिनींवर अत्याचार करण्याच्या अधर्मामुळेच असायचा. कधी कळणार हे!
आठवा काय म्हणालात तुम्ही…
काय तर म्हणे “परवाच्या दिवशी जी घटना घडली, ती घटना कुठल्याही फोर्सफुली, तिथं कुठलाही स्ट्रगल, अथवा असं तिथं कुठलंही न झाल्यामुळे…जेव्हा ही घटना घडली तेव्हाही तिथंदेखील जवळपास दहा ते पंधरा लोक बसच्या आजूबाजूला उपस्थित होते. आणि कुणालाही कुठे शंका आली नाही. त्यामुळे त्याला कदाचित ते क्राइम सुरळीतपणे करता आले. आरोपी आपल्या ताब्यात येईल तेव्हा सर्व गोष्टी लक्षात येतील.”
तुमची जीभ उचललीच कशी गेली. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय? त्या पीडित स्त्रीचीच चूक आहे? तिला तो नराधम बसकडे नेताना तुमचे कर्मचारी होते कुठे? ती फसली, तिला माहीत नव्हतं, पण त्यांना तर माहीत होतं बस जाणार नाही. कदमसाहेब, बसच्या अंधारात अचानक दरवाजा बंद झाला. तो नराधम तुटून पडला. घाबरली असणार ती आपली बहीण. शक्यच झालं नसणार तिला काही करणं. पण तिनं रोखण्याचा प्रयत्न केलाच केला असणार. कोणतीही स्त्री जर परपुरुषाचा स्पर्श झाला ना तरी शहारते इथं तर बलात्कार झाला. एकदा नाही दोनदा. तरीही तुम्ही म्हणता प्रतिकारच झाला नाही. याला अप्रत्यक्षरीत्या केलेलं चारित्र्यहनन म्हणतात. आधी झालेला बलात्कार. ती दहशत. तो बलात्कार शरीरावरच नसतो बाईच्या मनावरही असतो. समाजातील काहींच्या नजरांनी नंतर होतच राहतो. ती स्त्री घाबरून गावी निघालेली. तिला धीर मिळाला ती पोलिसांकडे गेली. तिला बहीण समजा. जा तिचं कौतुक करा. तिनं जर धाडस दाखवत तक्रार केली नसती तर हा नराधम दत्ता गाडे मोकाट फिरला असता. आणखी काही मुली, महिला त्याच्या बळी ठरल्या असत्या. कौतुक करा या लाडक्या बहिणीचं!
जाता जाता शेवटचं. लाडक्या बहिणींनी सत्ता दिली. कृतज्ञता राखली. तुम्ही दिलेलं टिचभर, त्यांनी मतं दिली ढिगभर. पण लक्षात ठेवा सत्ता देणारी लाडक्या बहीणीही छत्रपती शिवाजी महाराजांनाच मानतात. महाराणी ताराराणी आठवा. वेळच आली तशी तर पापी औरंगजेबाला त्या रणरागिणीनं कधी उसंत मिळू दिली नाही. हा महाराष्ट्र महाराजांचा आहे, रांझ्यांच्या पाटलाच्या नराधम अवलादीला वाचवणाऱ्यांचा नाही. आतापुरतं इतकंच!
संपर्क ९८३३७९४९६१
नेमकं काय बोलले मंत्री योगेश कदम?