मुक्तपीठ टीम
मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही असा दावा करणारे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सोमवारी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर रामदास कदम यांनी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. मी पर्यावरणमंत्री असताना आदित्य ठाकरे दीड वर्षे मंत्रालयातील केबिनमध्ये माझ्यासोबत बसायचे. त्यावेळी मला ‘काका-काका’ अशी हाक मारणारे आदित्य ठाकरे पुढे जाऊन माझंच खातं घेतील, असे वाटले नव्हते, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरे यांनी संयम पाळायला हवा होता!!
- माझं वय ७० आहे पण आदित्यलाही मला साहेब म्हणावं लागतंय.
- म्हणतोय साहेब कारण ते ठाकरे आहेत.
- मातोश्रीमधले आहेत
- आदित्यसाहेबांची ही भाषा? अन्य कुठल्या नेत्याच्या तोडून ही भाषा आम्ही समजू शकतो.
- पण आदित्यजींनी संयम पाळायला हवा होता
- मी पर्यावरणमंत्री असताना आदित्य ठाकरे दीड वर्षे मंत्रालयात माझ्या केबिनमध्ये येऊन बसायचे.
- तेव्हा आदित्य ठाकरे केबिनमध्ये बसून सांगायचे की, ‘भाई या अधिकाऱ्यांना बोलवात, त्या अधिकाऱ्यांना बोलवा.
- मिटिंग लावा, सचिवांना बोलवा.
- खरंतर बाहेरच्या माणसाला मंत्रालयात अशाप्रकारे बोलावून मिटिंग लावता येत नाही.
- पण आदित्य हे उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव असल्याने मी ते देखील केले.
प्लॅस्टिकबंदी निर्णयाचे श्रेय आदित्य ठाकरे यांना!!
- पर्यावरणमंत्री असताना प्लॅस्टिकबंदीचा निर्णय मी घेतला.
- पण त्याचे श्रेय आदित्य ठाकरे यांना देऊन त्यांना मोठे करण्यात आले.
- तेव्हाही मी काही बोललो नाही.
- पण मला कुठे माहिती होतं की, जे आदित्य ठाकरे आपल्याला काका-काका बोलत आहेत, उद्या तेच माझं घेऊन मंत्रालयात बसणार आहेत.
- मला या गोष्टीची जराशीही कल्पना नव्हती.
- माझ्या संपूर्ण आयुष्यात मी इतकं राजकारण कधीच केलं नाही.
आम्ही आमच्या कर्तृत्वाने मोठे झालोय!!
- उद्धवजी अनेकदा म्हणतात, कोणाला किती द्यायचं?
- पण उद्धवजी तुम्ही सर्वकाही देत नाही.
- माणूस आपल्या कर्तृत्त्वाने मोठा होतो.
- जसा पक्ष आहे, तसं त्या माणसांचं योगदान आहे.
- हे समजून घ्या.
- तुम्ही एखाद्याला मंत्रीपद देता म्हणजे भीक देत नाही.