मुक्तपीठ टीम
बारावीचा निकाल उदंड यशाचा लागल्यानंतर आता इतक्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्याचं नवं आव्हान समोर आलं आहे. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाण्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, तसं होणार नाही, असा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे. पदवी परीक्षांसाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. म्हणजेच बारावीच्या गुणांवरच पदवीची प्रवेश प्रक्रिया गुरुवारपासून सुरु होणार आहे.
प्रवेश परीक्षा न घेण्याचा निर्णय
- कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीत बारावीच्या निकालावरच पुढील पदवी परीक्षांसाठी प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.
- आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या पारंपरिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया गुरुवारपासून सुरु होईल.
- आवश्यकतेनुसार, तुकड्यांची वाढ किंवा विद्यार्थी संख्येत वाढ हवी असल्यास ३१ ऑगस्टच्या आधी त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावा.
- एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी विद्यापीठानं घ्यायला हवी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
उत्तीर्णांचं प्रमाण खूपच जास्त असल्यानं प्रवेश नसणार सोपा
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल दहावी आणि अकरावीमध्ये मिळालेल्या सरासरी गुणांच्या आधारे आणि बारावीचे अंतर्गत मूल्यमापन याआधारे जाहीर करण्यात आला.
- निकालाची टक्केवारी जवळपास साडेआठ टक्क्य़ांनी वाढली.
- १३ लाख १४ हजार ९६५ नियमित विद्यार्थी प्रवेशाच्या रांगेत आहेत.
- यंदा पुनर्परीक्षार्थीचे उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त होते.
- ६३ हजार ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
- साधारण २६ हजार ३०० खासगीरित्या प्रविष्ट झालेले विद्यार्थी प्रवेशाच्या रांगेत आहेत.
- गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्याची संख्या अधिक आहे.
- त्यामुळे पदवी प्रवेश प्रक्रिया सोपी नसणार आहे.
- मुंबई, पुणे, नागपूर विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, नामवंत संस्थांमध्ये पारंपरिक किंवा सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळवणे कठीण होणार आहे.