मुक्तपीठ टीम
मुंबईत रोजच्या नव्या रुग्णांचा आकडा वीस हजारावर गेल्यास लॉकडाऊनचा इशारा पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिला होता. पण आता वीस हजार नवे रुग्ण होत असताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत पूर्ण लॉकडाऊनपेक्षा शनिवार-रविवारी लॉकडाऊनवर विचार केला जात असल्याची माहिती दिली आहे. तसेच निर्बंध वाढवण्याचे सुतोवाचही त्यांनी केले. त्यांनी त्याबद्दल स्पष्ट सांगितले नसले तरी रात्रीची संचारबंदी, तसेच कार्यालयीन उपस्थितीवर निर्बंध वगैरे उपाययोजनांची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घाबरू नका, पण काळजी घ्या!
- सध्या तरी मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन होणार नाही.
- पण १०-१२ टक्के नागरिक बेफिकीर वागतात. ते तसेच राहिले तर परिस्थिती बिघडेल. तर आगामी काळात लॉकडाऊन करावा लागू शकतो. मुंबईकरांनी घाबरण्यापेक्षा काळजी घ्यावी.
- आपण माध्यमातून बघत आहोत. डॉक्टर्स, बेस्टचे कर्मचारी कोरोनाबाधित होत आहेत.
- ओमायक्रॉन हा गंभीर स्वरुपाचा नाही, असं समजू नका.
- तसं जागतिक आरोग्य संघटनेनेही तसा इशारा दिला आहे.
- त्याला गंभीर समजलं तर पुढे कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागणार नाही.
संध्याकाळी कोरोना निर्बंधांवर निर्णयाची शक्यता
- आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच शरद पवार यांच्याशी बोलून योग्य निर्णय घेतला जाईल.
- शनिवार आणि रविवारी सुट्ट्या असल्यामुळे या दोन दिवसात मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढते.
- त्यामुळे धोकापातळी ओंलाडताना दिसत आहे.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय खंबीरपणे घेत आहेत.
- संध्याकाळी सात वाजेपर्यंत काय निर्णय आहे तो समजेल.
- निर्बंधामध्ये वाढ होऊ शकते. सौम्य लक्षणांची रुग्णसंख्या बरीच आहे. धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर धावपळ उडेल, ही धावपळ वेळीच रोखली जावी, यासाठी उद्धव ठाकरे घिसाडघाईने निर्णय घेणार नाहीत.
- ते योग्य निर्णय घेतील.
- सध्यातरी लॉकडाऊन लागणार नाही. मात्र मिनी लॉकडाऊनवर विचार केला जातोय.