मुक्तपीठ टीम
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अंतर्गत “चला जाणूया नदीला” हे अभियान येत्या २ ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी सुरु होत आहे. त्याचा एक भाग म्हणून ७५ नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ होणार आहे. या अभियानाचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने निर्गमित केला आहे. राज्यातील नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या अभिनव उपक्रमाचे नियोजन केले आहे.
‘चला जाणुया नदीला’ अभियानात काय अपेक्षित?
- महाराष्ट्राला वारंवार भेडसावणाऱ्या पूर आणि दुष्काळ या समस्यांपासून मुक्तीसाठी नदी संवाद अभियानाचे आयोजन करणे
- या अभियानांतर्गत जनसामान्यांना नदीसाक्षर करण्याबाबत उपाययोजना आखणे आणि त्याची अंमलबजावणी करणे.
- अमृत वाहिनी बनविण्यासाठी मसूदा तयार करणे, नदीचे स्वास्थ्य आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार व प्रसारासाठी रुपरेषा आखणे.
- नदीचा तट आणि प्रवाह जैवविविधतेबाबत प्रत्येक जिल्ह्यात प्रचार, प्रसार व नियोजन करणे.
- नदीच्या पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करुन त्यावर संबंधितांना कार्यवाहीसाठी अहवाल सादर करणे.
- पावसाचे पाणी अडवून भूजल स्तर उंचावणे.
- अतिक्रमण तसेच शोषण आणि प्रदूषण या तीन कारणांचा अभ्यास आणि त्याचा नदी व मानवी जीवनावर होणारे परिणाम अभ्यासणे.
- महाराष्ट्रातील सुमारे ७५ नदी खोऱ्यांतून नदी संवाद यात्रा आयोजित करण्याबाबत आराखडा तयार करणे शासनाबरोबर समाज आणि नदीवर काम करणाऱ्या संस्थांमध्ये सुसूत्रता आणणे.
- स्थानिक स्वराज्य संस्था यांचे जलव्यवस्थापन तपासणे अशी या समितीची ध्येय आणि उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.
गठित करण्यात आलेल्या समितीत मुख्य सचिव हे अध्यक्ष असतील. महसूल आणि ग्राम विकास विभागाचे अपर मुख्य सचिव हे सदस्य असतील. वने विभागाचे प्रधान सचिव या समितीचे कार्याध्यक्ष असतील. जलसंपदा, जलसंधारण, कृषी, शालेय शिक्षण, नगरविकास -२, पर्यावरण, उद्योग, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, पाणी पुरवठा व स्वच्छता या विभागाचे प्रधान सचिव या समितीमध्ये सदस्य असतील. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक, महाराष्ट्र जैवविविधता मंडळ, नागपूर, पुण्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक, सांस्कृतिक कार्यचे सचिव आणि जल व भूमी व्यवस्थापन संस्था अर्थात वाल्मीचे महासंचालक या समितीत सदस्य असणार आहेत. याशिवाय या समितीमध्ये अशासकीय सदस्य असणार आहेत. डॉ. राजेंद्र सिंग विशेष निमंत्रित म्हणून असणार आहेत. यात डॉ. सुमंत पांडे, नरेंद्र चौघ, जयाजी पाईकराव, रमाकांत कुलकर्णी, डॉ. गुरुदास नुलकर, अनिकेत लौयीया, राजेश पंडित, महेंद्र महाजन या समितीत सदस्य असणार आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक या समितीत सदस्य सचिव असतील.या समितीचे कार्यकाळ एक वर्ष अथवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत असेल.
महात्मा गांधी जयंती दिनी ७५ नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ होणार
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध अभियानांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने वर्धा येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा समारोप, ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ, वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय आणि नियोजन भवनाचे उद्घाटन याबरोबरच ७५ नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ देखील करण्यात येणार आहे.
या सर्व उपक्रमांचा आणि नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ कार्यक्रम वर्ध्यातील जिल्हा क्रिडा संकुल येथे होणार असून या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्याच बरोबर “हॅलो ऐवजी वंदे मातरम्” या अभियानाचे संकल्पक आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मॅगसेसे पुरस्कार विजेते आणि जलबिरादरीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री नागोराव गाणार,रामदास आंबटकर, अभिजित वंजारी, रणजित कांबळे, दादाराव केचे, समीर कुणावार, डॉ. पंकज भोयर उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील नद्यांचे आरोग्य चांगले राहिले तरच आपले आरोग्य चांगले राहणार आहे आणि हेच ओळखून महाराष्ट्रातील गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिम वाहिन्यांच्या खोऱ्यातील एकूण ७५ नद्यांचे संवर्धन करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वर्धा येथील सेवाग्राममध्ये “चला जाणूया नदीला” या महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील ७५ नद्यांचे संवर्धन करीत असताना राज्यातील नद्यांची सद्यस्थिती नेमकी काय आहे. तसेच नदी संवर्धन करताना काय करणे आवश्यक आहे, याची दिशा मिळण्यास या महोत्सवाच्या माध्यामातून मदत होणार आहे. राज्य शासनाच्या या उपक्रमात लोकसहभाग मिळाला तरच हा महोत्सव यशस्वी होईल, त्यामुळे नागरिकांनी या महोत्सवात मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.