मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार अभिनेते अमोल कोल्हे यांची एक फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एकांतवासात जात असल्याची घोषणा केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. खरंतर त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार ते विपश्यनेसाठी चालले आहेत. एकांतवासाचा भलता अर्थ काढला जाऊ नये. पण त्यांनी काही निर्णयाचा फेरविचार आणि विचार करण्याची गरज असल्याचा पोस्टमध्ये उल्लेख केल्यामुळे अनेक तर्क लावले जात आहे.
पोस्टमध्ये काय म्हणाले अमोल कोल्हे?
- ‘सिंहावलोकनाची वेळ:- गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो.
- काही टोकाचे निर्णय घेतले. अनपेक्षित पावलं उचलली.
- पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय.
- थोडा शारीरिक, बराचसा मानसिक थकवा आलाय.
- शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल; पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं-थोडं मनन, थोडं चिंतन!
- घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचारसुद्धा!
- त्यासाठीच एकांतवासात जातोय.
- काही काळ संपर्क होणार नाही!
- पुन्हा लवकरच भेटू…नव्या जोमाने, नव्या जोशाने!
- टीप:- फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही.
खासदार अमोल कोल्हे यांनी पोस्टमध्ये गेल्या काही वर्षात घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटल्यामुळे अनेक तर्क-वितर्क काढले जात आहे. या पोस्टमुळे राजकीय क्षेत्रात उलट-सुलट चर्चेला उत आला आहे. “पण त्याच पोस्टमध्ये त्यांनी एक खास टीप जोडली आहे. फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही.” त्यातून वेगळा काही राजकीय अर्थ काढला जाऊ नये, असे त्यांनी सुचवल्याचे मानले जाते.








Subscribe