मुक्तपीठ टीम
देशातील १२५ कोटी जनतेपैकी केवळ ३ कोटी ७० लाख नागरिकच आयकर भरतात असे देशाचे अर्थमंत्री वारंवार मांडतात. मात्र, प्रत्यक्षात त्यांचा दावा निरर्थक आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन यांनी म्हटले आहे. याविषयी चाटर्ड अकाऊंटन्ट आणि कंपनी सेक्रेटरींच्या संघटनांच्या वतीने अर्थमंत्र्यांना एक पत्र लिहिण्यात आले असल्याची माहितीही महाजनांनी दिली आहे.
महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाटर्ड अकाऊंटन्ट आणि कंपनी सेक्रेटरींच्या संघटनांच्या वतीने अर्थमंत्र्यांना एक पत्र लिहिण्यात आले आहे. त्या पत्रानुसार, देशातील करदातेविषयक वस्तुस्थिती वेगळी आहे. सव्वाशे कोटींपैकी एकूण मतदार ८२ कोटी आहेत. त्यापैकी ७५ टक्के म्हणजे ६१ कोटी ५० लाख शेतकरी आहेत. शेतकऱ्यांना सरकारनेच आयकर माफी दिलेली आहे. उरले २० कोटी ५० लाख, त्यातून दारिद्र्य रेषेखालील २४ टक्के लोक वजा केले आणि ज्येष्ठ नागरिक, न कमाणाऱ्या संसारी महिला, बेरोजगार युवक हे वजा केले तर केवळ ३ कोटी ७५ लाख एवढेच आयकर विवरण पत्रे भरू शकणारे किंवा कर भरु शकणारे नागरिक उरतात. याचा सरळ अर्थ असा की, आयकर कायद्याच्या अंमलबजावणीतून स्वतःला दूर ठेवणारे केवळ ५ लाख नागरिक आहेत.
रत्नाकर महाजन यांनी या आकडेवारीचा हवाला देऊन सरकारला काही सूचना केल्या आहेत. वास्तवात कर न भरणाऱ्या ५ लाख नागरिकांना आयकर जाळ्यात कसे आणायचे किंवा आज दिल्या जाणाऱ्या कर सवलतीत किती कपात करायची याचा निर्णय घेणे हे सरकारचे काम आहे. ते न करता केवळ लोकांना दोष देऊन अर्थमंत्री व केंद्र सरकार स्वतःची जबाबदारी टाळत असल्याचे दिसत आहे, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.