मुक्तपीठ टीम
शिवसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येत आहेत. शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांनी माझ्या मुलाला तिकीट मिळू नये म्हणून अनिल परब यांनी खूप प्रयत्न केले. असं गंभीर आरोप केला. तसेच त्यांनी शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे मंत्री हरामखोरी करीत आहेत व शिवसेनेशी बेईमानी करत मनसे व राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना संपविण्याचा, रामदास कदमला संपविण्याचा घाट घालत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्रही लिहिले आहे.
अनिल परबांविरोधात रामदास कदमांचा हल्लाबोल?
- गेली २ वर्षे पालकमंत्री अनिल परब फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला जिल्ह्यात येतात. संपूर्ण जिल्हा त्यांनी वाऱ्यावर सोडला आहे.
- जिल्ह्यात कुठलाही संपर्क, समन्वय नाही.
- तालुकाप्रमुखांची नावेही त्यांना माहिती नाही.
- पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात त्यांनी कोणतंही काम केलेलं नाही.
- त्यामुळेच आज जिल्ह्यात शिवसेनेत प्रचंड असंतोष आहे.
- त्यांच्या खासगी मालमत्तेविरोधात मी बोलणं म्हणजे शिवसेनेविरोधात बोलणं होत नाही.
- त्यांच्या रिसॉर्टविरोधात बोलल्यामुळेच माझ्याविरोधात घोषणा दिल्या गेल्या, असं रामदास कदम म्हणाले.
- मिलिंद नार्वेकर यांचा बंगला अनाधिकृत होता म्हणून तो पाडला गेला.
- काही कार्यकर्त्यांनी माझ्या विरोधात घोषणा केली. त्यांच्या मागे कोण होतं हे मला माहित होतं.
- मी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो मी कधीच किरीट सोमय्या यांच्याशी बोललो नाही.
- मी कधीही पक्षाच्या विरोधात काम केलं नाही.
परब हे कदम आणि खेडेकरांचे महात्मा गांधी!
- अनिल परब यांनी माझ्या मुलाला तिकीट मिळू नये म्हणून राष्ट्रवादीच्या संजय कदमला मातोश्रीवर आणलं होतं.
- त्यांनी दोन वर्षात माझ्या मुलाचा एकदाही फोन घेतला नाही.
- संजय कदमशी सातत्याने संपर्क ठेवला.
- या भागात वैभव खेडेकर आणि संजय कदम यांना सातत्याने पाठी घालण्याचं काम केलं.
- अनिल परब हे कदम आणि खेडेकरांचे महात्मा गांधी आहेत.
- गद्दार कोण अनिल परब की रामदास कदम हे शिवसैनिकांना कळलं पाहिजे.
हा निष्ठावंत कसा?
- अनिल परब हे मंत्रीपद मिळाल्यानंतर शिवसेनेच्या मुळावर उतरले.
- दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत.
- योगेश कदम आमदार आहेत.
- त्यांनी उमेदवार पाहिले.
- पक्षाला कळवलं. आणि पक्षनेत्यांनी मुलाखती घेतल्या.
- पण संजय कदमने भगवा झेंडा जाळून पायाखाली तुडवला होता.
- कदमला गाडून आम्ही भगवा फडकवला.
- परबने मिटिंग बोलावली या मिटिंगला तटकरे आणि सूर्यकांत दळवी होते.
- पाच वर्ष या सूर्यकांत दळवीने संजय कदमच्या खांद्याला खांदा लावून माझ्या मुलाविरोधात काम केलं.
- आमच्या पक्षाचे निष्ठावंत नेते उदय सामंत यांना बोलावून घेतलं.
- त्यांच्याकडून निष्ठा शिकावी लागते.
- त्यांना परब यांनी बोलावलं आणि तिकीट वाटप केलं.
- राष्ट्रवादी ९, शिवसेनेला ५ जागा.
- पहिले अडीच वर्ष नगराध्यक्ष राष्ट्रवादीला.
- शिवसेनेची पाच वर्ष सत्ता असतानाही राष्ट्रवादीला नगराध्यक्षपद दिलं.
- हा निष्ठावंत कसा?
रामदास कदम यांचे पत्र जसं आहे तसं…
उद्धवजी पुन्हा आपल्याला हात सोडून सांगतो की, आम्हाला बाजूला ठेवून ज्यांना विश्वासाने मंत्रिपद दिले. ते कुणाची घरे फोडणे, शिवसेना नेत्याला इतर पक्षांच्या पुढाऱ्यांना हाताशी धरून संपवणे अशी कामे करत आहेत. कृपा करून त्यांना थांबायला सांगावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
रामदास कदम यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, सूर्यकांत दळवी माझ्यावर वारेमाप टीका करतो. ग्रामपंचायत निवडणुका, पंचायत व जिल्हा परिषद निवडणुका, विधासनभा निवडणूक, लोकसभा निवडणूक, नगरपालिका निवडणूक या सर्व निवडणुकांमध्ये त्याने उघडपणे शिवसेनेच्या विरोधात काम केले आहे, अशी तक्रारही त्यांनी केली आहे.
कदम पुढे म्हणतात की, राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्यासोबत मागील चार वर्षांपासून (महाआघाडीच्या आधीपासून) काम करीत आहे. नुकत्याच नारायण राणे यांच्या जनयात्रेमध्ये ज्यांनी आवर्जुन हजेरी लावली. त्या सूर्यकांत दळवीची (सूर्याजी पिसाळ) पक्षातून हकालपट्टी का होत नाही? याचे आकलन नाही, अशी खंतही त्यांनी नोंदवली आहे. सोबतच मनसेचा नगराध्यक्ष वैभव खेडेकर याच्या भ्रष्टाचाराला आपलेच मंत्री खतपाणी घालतात. त्याला मदत करतात. मग आपल्या (शिवसेनेच्या) मंत्र्यांचा हेतू काय, फक्त रामदास कदम याला संपविणे असाच आहे का, असा प्रश्नी त्यांनी पत्रातून विचारला आहे.
रामदास कदम पुढे म्हणतात की, उद्धवजी अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्टचे प्रकरण गाजत आहे. त्या साई रिसॉर्टच्या उद्घाटनच्या पूजेला राष्ट्रवादीचा माजी आमदार व मनसे नगराध्यक्ष कसा जातो? त्याचे फोटोसह आपल्याला पुरावे देईन. मी, आम्ही नेमके काय करायचे? मात्र, मी शिवसेनेचा नेता आहे, त्याचे भान आहे. त्यामुळे आजपर्यंत किरीट सोमय्या यांच्याकडे कधीही संपर्क साधला नाही, बोललो नाही व त्यांच्याशी काहीही संबध नाही, याचा खुलासाही त्यांनी या पत्रातून केला आहे.
कदम पत्राच्या शेवटी म्हणतात की, जे मंत्री हरामखोरी करीत आहेत व शिवसेनेशी बेईमानी करत मनसे व राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना संपविण्याचा, रामदास कदमला संपविण्याचा घाट घालत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी विनंती.
भेटी अंती सविस्तर बोलू.