मुक्तपीठ प्रतिनिधी
मुंबई : देशातील पक्षांतर, पक्षफोडी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या घटनात्मक व लोकशाहीविषयक प्रश्नांचा सविस्तर परामर्श घेणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे लिखित ‘लोकशाही, संविधान आणि पक्षांतर’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात होणार आहे.
या पुस्तकाला सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांची प्रस्तावना लाभली आहे. पक्षांतराचा इतिहास, त्यासंबंधीचे विविध कायदे, महत्त्वपूर्ण न्यायालयीन निकाल, निवडणूक आयोगाची भूमिका तसेच विधानसभा आणि लोकसभा अध्यक्षांनी वेळोवेळी दिलेल्या निर्णयांचा या पुस्तकात आढावा घेण्यात आला आहे. गुंतागुंतीचे घटनात्मक आणि कायदेशीर विषय सर्वसामान्य वाचकाला समजतील अशा सोप्या मराठीत मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.
या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोदे, अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, विचारवंत, लेखक कवी संजीव खांडेकर, वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण हे मान्यवर असणार आहेत.
सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्षांतर आणि पक्षफोडीचे प्रकार वारंवार चर्चेत येत आहेत. त्यातून निवडणूक आयोग, न्यायालये, राज्यपाल तसेच विधानसभा आणि लोकसभा अध्यक्षांचे घटनात्मक अधिकार यावरही मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. या घडामोडींचा देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर दूरगामी परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर विविध घटनात्मक तरतुदी आणि प्रत्यक्षात घडलेल्या प्रकरणांचा वेध पुस्तकात घेण्यात आला आहे.
भारतीय संविधान हाच या पुस्तकाचा आत्मा असल्याचे लेखक तुळशीदास भोईटे यांनी म्हटले आहे. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय नागरिकांना दिलेले अधिकार, नागरिकांची कर्तव्ये आणि लोकशाही व्यवस्थेतील संविधानाचे अनन्यसाधारण महत्त्व यावर पुस्तकात विशेष भर देण्यात आला आहे.
प्रत्येक भारतीयाला माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. या संविधानाला केंद्रस्थानी ठेवून लोकशाहीच्या रक्षणासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे भोईटे यांनी सांगितले. अन्यायाविरोधात समाजाने सतर्क राहणे आणि सातत्याने आवाज उठवणे आवश्यक आहे, ही भूमिका पुस्तकातून अधोरेखित करण्यात आली आहे.
पक्षांतरासंदर्भातील कायदेशीर आणि घटनात्मक घडामोडींची माहिती एकत्रितपणे मराठीत उपलब्ध करून देणारा हा वेगळा प्रयत्न असल्याचे भोईटे यांनी नमूद केले आहे.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यासोबत ‘मुक्तपीठ सन्मान समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात तीनही माध्यमांमधील प्रतिभावंतांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ, किल्ला कोर्टासमोर आझाद मैदानाशेजारी असलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन लेखक तुळशीदास भोईटे यांनी केले आहे.







Subscribe