मुक्तपीठ टीम
आपण स्वतःसाठी, परिवारासाठी तर जगतोच परंतू आपले राज्य, आपले राष्ट्र यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे. समाजात जे आपल्यापेक्षा पाठीमागे आहेत त्यांना सोबत घेऊन त्या समाजाला पुढे नेण्याचे कार्य केले पाहिजे आणि हेच कार्य बंतारा समाज करीत आहे. सर्वांना सोबत घेवून बंतारा समाजाने व्यावसायिक प्रगती केली, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आज कुरेशी नगर कुर्ला, मुंबई येथे आयोजित केलेल्या विश्व बंतारा संमेलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.या संमेलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हरीश शेट्टी यांच्या लिखित पुस्तकाच प्रकाशन करण्यात आले.याप्रसंगी व्यसपीठावर खासदार गोपाळ शेट्टी,आणि हरिष शेट्टी,मोहनदास शेट्टी, पौर्णिमा शेट्टी,प्रवीण शेट्टी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बंतारा समाजाने मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये प्रगती केली आहे. या समाजाने छोट्या व्यवसायापासून सुरुवात केली. छोट्या रेस्टॉरंट पासून फाईव्ह स्टार हॉटेल पर्यंत त्यांच्या व्यवसायाची प्रगती झाली. आज असे कोणतेही क्षेत्र नाही त्यामध्ये बंतारा समाज नाही. सामाजिक संघटनाचे काम बंतारा समाजाने केले आहे. बेघर लोकांना घरे देण्यापासून ते विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याचे सामाजिक कार्य बंतारा समाजाने केले. बंतारा समाजाची एवढी क्षमता आहे की हा समाज जिथे जातो तिथली भाषा, संस्कार आणि व्यवहार अंगीकारतो. ज्याप्रमाणे साखर दुधात मिसळल्यानंतर दुधाची गोडी वाढते, त्याचप्रमाणे बंतारा समाजाने मुंबई, महाराष्ट्रात मिसळून इथल्या जगण्याची गोडी वाढवली आहे, अशा शब्दात समाजाचा गौरव करून फडणवीस यांनी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
या विश्व संमेलनात बंतारा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Subscribe