मुक्तपीठ टीम
माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देत नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या कामकाजावर टीका करत त्यांना पत्र लिहिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेतेपदी माझी नियुक्ती केली होती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर या पदाला काहीच अर्थ राहिला नाही, असं रामदास कदम म्हणाले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
- मी आता रामदास कदम यांच्याशी बोलणार आहे.
- आमदार योगेश कदम पहिल्या दिवसापासून आमच्यासोबत आहे याबद्दल सर्वांना माहिती आहे.
- रामदास कदम यांच्या शुभेच्छा आधीपासूनच आमच्यासोबत होत्या.
रामदास कदम यांचं पत्र जसं आहे तसं!!
दि. १८.०६.२०२२
सन्माननीय उध्दवजी ठाकरे,
यांसी
जय महाराष्ट्र !
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहीली नाही, हे मला पहायला मिळालं.
आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला व माझा मुलगा आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानित करण्यात आले.
विधानसभेच्या निवडणूकीच्या आधी आपण मला आचानक मातोश्रीत बोलवून घेतले आणि मला आदेश दिलेत की यापुढे तुमच्यावरती कोणीही कितीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोण काही बोललं तरी आपण मीडियासमोर अजिबात जायचे नाही. मीडियासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही, यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही. मागील ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करित आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे.
२०१९ साली आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सरकार बनवत होतात त्याही वेळी मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत संघर्ष केला आणि हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती करु नका. ती बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा होईल, अशी आपल्याला विनंती केली होती. पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही, याचेही दुःख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेना प्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती आणि म्हणून मी आज ‘शिवसेना नेता’ या पदाचा राजीनामा देत आहे.
कोण आहेत रामदास कदम?
- रामदास कदम हे शिवसेनेचा आक्रमक चेहर आणि निष्ठावंत नेत्यांपैकी एक आहेत.
- २००५ ते २००९ आघाडी सरकारमध्ये रामदास कदम हे विरोधी पक्षनेते होते.
- २००५ मध्ये त्यांची शिवसेना नेतेपदी निवड झाली.
- २०१० मध्ये रामदास कदम विधानपरिषदेवर निवडून गेले. २०१४ मध्ये फडणवीस सरकारमध्ये त्यांना पर्यावरण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली.
- २०१६ मध्ये पुन्हा त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लावण्यात
- २०१९ मध्ये त्यांचे सुपुत्र योगेश कदम हे दापोली मतदारसंघातून निवडून आले आहेत. शिवसेनेचा कोकणातील चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. कोकणात राणेंना टक्कर देणारा नेता म्हणून रामदास कदम हे नाव घेतलं जातं. शिवसेनेतील पहिल्या फळीतील एक आक्रमक आणि वजनदार नेते म्हणून रामदास कदम यांची आजही महाराष्ट्रात ओळख आहे. २०१९ मध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली आणि रामदास कदम बाजूला पडले.