मुक्तपीठ टीम
नुकताच राज्य सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. मात्र या अर्थसंकल्पात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पत्रदरात काहीच पडलेले नाही. मोबाईल देण्याची घोषणा वगळता त्यांच्या वाटेला काहीच आलेले नाही त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे. मानधन वाढीची जी बातमी देण्यात आली ती चुकीची होती असे सांगण्यात आले. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी संतापले असून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने मंगळवारी आझाद मैदानावर संताप मोर्चा काढला. यावेळी हजारोंच्या संख्येने कर्मचारी सहभागी झाल्या असून त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला.
आंदोलनात हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सहभाग…
- गेल्या काही महिन्यांपासून अंगणवाडी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी सातत्याने आंदोलन करत आहेत.
- २३ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले.
- महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव कुंदन यांनी शिष्टमंडळाला भेट दिली व अनेक आश्वासने दिली होती.
- तीन दिवसांचे आंदोलन त्यांच्या आश्वासनामुळे पहिल्याच दिवशी मागे घेतले गेले.
- त्यानंतर सर्वजण अर्थसंकल्पाकडे डोळे लावून होते. मात्र त्यातही या कर्मचाऱ्यांची घोर निराशा करण्यात आली आहे.
- या एकंदर पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची ऑनलाइन बैठक घेण्यात आली.
- या बैठकीतच १५ मार्च रोजी आझाद मैदानावर संताप मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- तरी राज्यातील हजारोच्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावरील या आंदोलनात उपस्थित राहिल्या.
सायंकाळी उशिरापर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे…
- केंद्र सरकारच्या अर्थसंकल्प तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून राज्य सरकारने देखील त्याचीच पुनरावृत्ती केली असल्याचे मत समितीने व्यक्त केले आहे.
- महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी शिष्टमंडळाला भेट न दिल्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धरणे चालू ठेवले.
- व भेट मिळेपर्यंत धरणे चालू ठेवण्याचा निर्धार केला.
- या आंदोलनात कृती समितीचे शुभा शमीम, बृजपाल सिंग, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, सुवर्णा तळेकर, आदींसह मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या मागण्या
- अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नियमित शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या.
- नवीन मोबाईल द्या.
- अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरीव स्वरूपाची वाढ करा.
- अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन योजना लागू करा.
- अंगणवाडी कर्मचाऱ्यांना १०० टक्के मराठी भाषेत पोषण ट्रॅकर ॲप देण्यात यावे.
- लाभार्थ्यांना चांगला पूरक पोषण आहार मिळावा.
- किरकोळ खर्चासाठीच्या रकमेत वाढ करावी.
- रिक्त जागांवर भरती व पदोन्नती करावी.