मुक्तपीठ टीम
दिवसाच्या सुरुवातीला चांगल्या चहाचा पहिला घोट म्हणजे दिवसाची मस्त सुरुवात मानली जाते. त्यातही दार्जिलिंग/कांगडा/आसाम/निलगिरी या पारंपरिक चहाची लज्जतच वेगळी. पण गेल्या काही दिवसांपासून या उत्कृष्ट भारतीय चहांमध्ये निकृष्ठ दर्जाच्या परदेशी आयात चहाची भेसळ होऊ लागल्याच्या तक्रारी येत होत्या. त्याची गंभीर दखल घेत टी बोर्डाने कडक पावले उचलली आहेत.
निकृष्ट दर्जाची चहा पावडर भारतात आयात आणि वितरित होणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी केंद्राने कठोर पाऊल उचलले आहे. यासंदर्भातील अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली . वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांच्या निर्देशानुसार, चहा मंडळाने ११.११.२०२१ रोजी चहा विपणन नियंत्रण आदेश, २००३, चहा (वितरण आणि निर्यात) नियंत्रण आदेश, २००५ अंतर्गत दार्जिलिंग भौगोलिक निर्देशांक (जीआय) चहाच्या संरक्षणासाठी जारी करण्यात आलेल्या चार परिपत्रकांचा तपशील खालीलप्रमाणे :
- आयात केलेल्या चहाचे उत्पत्ती स्थान त्यांच्या सर्व विक्री पावत्यांमध्ये नमूद केल्याचे सुनिश्चित करणे आणि आयात केलेला चहा मूळ भारतीय चहा म्हणून न देण्याचे सर्व आयातदारांना निर्देश दिले आहेत.
- देशांतर्गत वापरासाठी स्वस्त आणि निकृष्ट दर्जाच्या आयात केलेल्या चहाचे ,भारतीय मूळ चहासोबत मिश्रण न करण्याचे निर्देश चहाच्या सर्व वितरकांना देण्यात आले आहेत.
- दार्जिलिंग चहाच्या उत्पादकांना भौगोलिक निर्देशांक (जीआय ) क्षेत्राच्या बाहेरील चहाची हिरवी पाने खरेदी न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- आयात केलेला चहा हा, दार्जिलिंग/कांगडा/आसाम (पारंपरिक)/निलगिरी (पारंपरिक ) या चहासोबत मिसळू नये असे निर्देश चहा खरेदीदारांना दिले आहेत.
- वरील निर्देशांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी, चहा मंडळाने विशेषतः नेपाळमधील चहाचे वितरक/आयातदार यांची आकस्मिक तपासणी सुरू केली आहे.११.११.२०२१ रोजी सिलीगुडीमधील ३ युनिट्सची आकस्मिक तपासणी करण्यात आली आणि चाचणीसाठी नमुने घेण्यात आले.
चहाच्या आयातीत झालेल्या वाढीमुळे देशांतर्गत भारतीय चहा उद्योगावर विपरित परिणाम होत असल्याचे मांडणाऱ्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. मात्र हे खरे नाही, असा दावा सरकारने केला आहे. एकूण चहा उत्पादनात आयातीची टक्केवारी साधारणपणे १-२% च्या दरम्यान असते,त्यापैकी मोठ्या प्रमाणात चहा, हा पुन्हा निर्यात करण्यासाठी असून देशांतर्गत वापरासाठी नाही. मूल्यवर्धन आणि मिश्रणाच्या उद्देशाने पुन्हा निर्यात करणे हा भारतात चहा आयात करण्याचा मुख्य उद्देश आहे. भारताच्या चहा उत्पादनाच्या तुलनेत चहाची आयात अत्यल्प आहे.