मुक्तपीठ टीम
‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा वाद काही संपायला तयार नाही. एकीकडे या चित्रपटाला विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटकही केली गेली. असं सर्व घडत असताना आता बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनीच चित्रपटातील इतिहासाची मोडतोड उघडी पाडत जाहीर आक्षेप नोंदवले आहेत. आम्ही चित्रपटातील कलाकारांकडे चित्रपट प्रदर्शित होण्याआधी दाखवा सांगितलं. त्यानंतर वारंवार विचारणा करूनही तसं झालं नाही,” असा गौप्यस्फोट बाजीप्रभूंच्या वंशज रुपाली देशपांडे यांनी केला आहे. त्यामुळे अभिजित देशपांडेंच्या या चित्रपटाच्या समर्थनार्थ सरसावलेले आता नेमकी काय भूमिका घेतात, हा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी कोणते आक्षेप घेतले?
- रुपाली देशपांडे म्हणाल्या की, हा चित्रपट बघितल्यानंतर आम्हाला जे आक्षेप वाटले, ज्या गोष्टी ऐतिहासिक संदर्भाला धरून नाहीत असं वाटलं त्यावर आमचा आक्षेप आहे. हा आक्षेप नोंद घेण्यासारखा आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. असं असताना चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंच्या तोंडी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख सातत्याने अरेतुरेच्या भाषेत दाखवला. हे अतिशय खटकणारं आहे आणि चुकीचं आहे. कारण शिवाजी महाराज आपलं आराध्य दैवत आहे. ते असं करणं टाळू शकले असते.
- दुसरा आक्षेप हिरडस मावळ येथे समुद्र दाखवला आहे. प्रत्यक्षात येथे कुठेही समुद्र नाही. तिथे नदी आहे. चित्रपटात तेथून महाराष्ट्र स्त्रिया, मुलींना इंग्रज बोटीतून घेऊन जाताना दाखवलं आहे. मात्र, त्याकाळी मावळमध्ये इंग्रजांचं खरंच इतकं प्राबल्य होतं का? हा मोठा प्रश्न आहे. यासंदर्भात आम्ही अनेक इतिहासकारांशी चर्चा केली. त्यांच्यानुसार, शिवाजी महाराजांनी त्यावेळी इंग्रजांना थोपवून धरलेलं होतं. मात्र, चित्रपटात इंग्रज सहजपणे स्त्रियांना घेऊन जाताना दाखवलं आहे.
- तिसरा आक्षेप म्हणजे, बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे ही सख्खी भावंडं आहेत. या सख्ख्या भावांमध्ये ‘सिनेमॅटिक लिबर्टी’च्या नावाखाली भांडण दाखवलं आहे. जो अगदी लहानपणाचं भांडण दाखवून त्याला विश्वासघात असं नाव दिलंय. तसेच फुलाजीप्रभूंनी त्यांचा लहान भाऊ बाजीप्रभू देशपांडेंचा विश्वासघात केल्याचं दाखवलं आहे. त्या दोघांचं भांडण असल्याचा ऐतिहासिक संदर्भ असल्याशिवाय असं दाखवणं योग्य नाही. यामुळे फुलाजीप्रभू देशपांडे यांची प्रतिमा डागाळली आहे. विशालगडावर या दोन वीरबंधूंची समाधी शेजारी शेजारी आहे. ते दोघेही स्वराज्यासाठी, महाराजांसाठी धारातीर्थी पडले. या दोघा भावांमध्ये २०-३० वर्षे वैर होतं आणि ते अचानक एकत्र आले असं होऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही.
- सिनेमॅटिक लिबर्डी काल्पनिक चित्रपटात वापरता येते. मात्र, ऐतिहासिक घटना बदलण्याचा आपल्याला अधिकार नाही. तो अधिकार कोणालाच नाही. त्यामुळे अशा घटना बदलणं अतिशय चुकीचं आहे. ऐतिहासिक घटनांचा क्रम बदलणंही चुकीचं आहे.
- चौथा आक्षेप म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला तेव्हा बाजीप्रभू देशपांडे त्याक्षणी तेथे उपस्थित नव्हते. मात्र, चित्रपटात बाजीप्रभू तंबूच्या बाहेर हजर असल्याचं दाखवलं आहे. त्यावेळी बाजीप्रभू दुसऱ्या मोहिमेवर होते. तर हे इतिहासाला धरून आहे का? की त्यावेळी बाजीप्रभू देशपांडे अजून कोणत्यातरी मोहिमेला होते. शिवा काशिद अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखा होती, मात्र चित्रपटात त्या व्यक्तिरेखेला थोडक्यात संपवण्यात आलं आहे. ज्यांनी जो पराक्रम केला तो आपण नाकारू शकत नाही.
- बाजीप्रभू देशपांडे हे बांदल-देशमूख यांचे सरनौबत होते, आणि त्यामुळे चित्रपटामध्ये त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची भांडणं होती हे आपल्या सर्वांना माहित आहे. प्रत्यक्षात त्यांच्यात जो काही वाद असेल ते कदाचित दुसऱ्या कोणत्या कारणांवरून असतील. कर वसुली ही या दोघांकडेही होती, तसं काही असू शकेल. पण चित्रपटात दाखवलं आहे की, पण इथे काही गोष्टी दाखवल्या आहेत, ते खटकण्यासारखं आहे.
- पाचवा आक्षेप, चित्रपटात अफजलखानाला बकरी दाखवून आणायचं तसं आणलं. त्याला आणण्यासाठी बाजीप्रभूंनी वाईट गवंडी घेऊन खोट्या पद्धतीची मंदिरं बांधली असं दाखवण्यात आलं आहे. अशी मंदिरं बांधणं इतकं सोपं आहे का? देऊळ हे आपलं श्रद्धास्थान आहे. आपण वाईट गवंडी घेऊन खोटी मंदिरं बांधू का? शिवाय महाराजांचं जे पत्र उपलब्ध आहे, तर त्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे की, महाराजांनी बाजीप्रभू देशपांडेंचा पराक्रम ओळखून अफजल खानाला निश्चितपणे इथ पर्यंत आणण्यासाठी त्यांनी वंरधा घाट आहे तिथे एक किल्ला बांधायला सांगितला होता. बाजीप्रभू देशपांडेंचा हा प्रांत नाही आहे. पण त्यांनी किल्ला हा बांधून घेतला होता.
बाजीप्रभू देशपांडेंच्या वंशजांचा चित्रपटाला आक्षेप!!
- ऐतिहासिक चित्रपट बनवताना इतिहास सल्लागारांची आवश्यकता असते.
- हा चित्रपट आधी इतिहासकारांना दाखवला होता का? वंशज म्हणून आम्हाला आधी हा चित्रपट दाखवला नाही.
- प्रत्यक्षात मी फेसबूक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून चित्रपटातील कलाकारांना चित्रपट प्रदर्शित होण्याआधी आम्हाला दाखवा असं सांगितलं होतं.
- तसेच त्यात आमच्या पूर्वजांचा चुकीचा इतिहास घेतला नाही ना इतकंच तपासायचं आहे हेही सांगितलं.
- त्यानंतर निर्माते तुम्हाला संपर्क साधतील असं सांगण्यात आलं होतं. पण कोणीही आमच्याशी संपर्क साधला नाही.
- आम्ही वेळोवेळी विचारणा केली. त्यामुळे आता चित्रपट पाहून आम्ही ही प्रतिक्रिया दिली आहे.
- यावेळी सुभेदार वाडी या गावी राहणारे अमर वामनराव देशपांडे, त्यांचा मुलगा किरण अमर देशपांडे, सुभाष दिघे- अमर देशपांडे यांच्या बहिणीचा मुलगा, महेश देशपांडे, राहुल दिघे, चांद्रसेनीय सीकेपी यांच्यावतीने अध्यक्ष मंदार कुलकर्णी, राहुल दिघे, राजेंद्र देशपांडे आदी या वंशज पत्रकार परिषदेत उपस्थित होते.








Subscribe