तुळशीदास भोईटे
आजवर ठाकरेंवर झाली नाही तशी टीका भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी केली. त्यांनी थेट ठाकरेंची औकातच काढली. तेही नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेच नाही तर राज ठाकरेंचीही त्यांनी औकात काढली. ते म्हणाले ते एकत्र येणार म्हणजे काय? आता काय त्यांची ताकद काय? काय आहे त्यांच्याकडे …दोघांचाही हिशेब करा. अगदी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही झाली छगन भुजबळ हे बंडखोरीनंतर त्यांचा उल्लेख टी बाळू असाही करत असत. काहीच धरबंद नव्हता भुजबळांना. पण कधी बाळासाहेबांची किंवा त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांची औकात काय असं भुजबळांनी विचारलं नव्हतं. नारायण राणे आक्रमकतनेने ठाकरेंवर तुटून पडले. कुणीही एकत्र येवू द्या ना. आता त्यांची काय ताकद आहे ते सांगा? काय होणार चमत्कार. अशी काय जादू आहे का त्यांच्याकडे की एकत्र आले म्हणजे वीज चमकणार. झालं सारं मतदान एकाबाजूला. अरे काय आहे त्यांच्याकडे. दोघांचाही हिशेब करा ना…कोणत्याही नेत्यांना असं विचारणं म्हणजे त्यांना हिणवणं म्हणजे त्यांची औकात दाखवणं…
खरंतर त्यांच्या आक्रमक चढाईतील हा फक्त थोडासा भाग. पण शितावरून भाताची परीक्षा तसं तुम्हाला कळलं असेलच राणेंनी ठाकरेंची औकात कशी काढली ते.
नारायणे राणे हे आक्रमक…खरंतर अनेकदा त्यांची आक्रमकता आक्रस्ताळेपणाकडेही झुकणारी. पण ते काही कुणाला जुमानत नसतात. जिथं असतात. तिथं ते असाच आवाज चढवत आपलं अस्तित्व दाखवतात. त्यातही २००५ पासून त्यांच्यासाठी ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे खास आवडीचे विषय. यावेळी त्यांनी राज ठाकरेंनाही सोबत लक्ष्य केलं. दोन्ही ठाकरेंची औकात काढली. त्यामुळे आता आज सरळस्पष्ट विश्लेषण करायचं आहे, ते याचंच की नारायण राणे यांनी दोन्ही ठाकरेंकडे काय आहे असं विचारलं, त्यांची ताकद विचारली…दोघांच्याही बळाचा हिशेब करा सांगितलं. एकप्रकारे राणेंनी ठाकरेंची औकात काढली…पण आता प्रश्न एवढाच आहे की, दोन्ही ठाकरे काय करणार? उद्धव ठाकरे काय करणार? राज ठाकरे काय करणार? दोन्ही ठाकरे येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये नारायण राणे आणि त्यांच्या भाजपाला बळ दाखवू शकणार? की राणे म्हणतात तसे भाजपाच्या पुरात ते वाहून जाणार. आपण आज पाच मुद्द्यांमधून समजून घेवूया…
मुद्दा – १
राणेंनी ठाकरेंची औकात का काढली?
- मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका
- ठाकरेंना हिनवून कमी लेखणं, समर्थकांमध्ये संभ्रमाची रणनीती
- भाजपाचा मुख्य सामना ठाकरेंशीच
- ठाकरेंना मविआतून तोडण्याचाही प्रयत्न
- राणेंनी उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरेंचा उल्लेख केल्यानं नुकसान
मुद्दा – २
ठाकरेंची ताकद किती?
- उद्धव ठाकरे ९ खासदार, २० आमदार
- लोकसभेला नंबर २, विधानसभेला नंबर ४चा पक्ष
- राज ठाकरे ० खासदार, ० आमदार
- मतांची टक्केवारी १० ते १२ टक्क्यांपर्यंतच
- पण दोघांकडेही मास अपिल
- ठाकरेंकडे गर्दी जमवण्याची क्षमता, उद्धव ठाकरेंकडे नियोजन कौशल्य
मुद्दा – ३
ठाकरे एकत्र येणार?
- ब्रँड ठाकरे मेगाब्रँड मोदींसमोर टक्कर देऊ शकतो
- त्यासाठी त्यांच्या एकीकरणावरून भाजपा महायुतीत अस्वस्थता
- पण दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची शक्यता कमी
- राज ठाकरे आणि समर्थकांच्या मनातील उद्धव ठाकरेंच्या आधीच्या वागणुकीमुळेचा राग कायम
- मनसेला बरोबर घेतल्याने फायदा होईल म्हणून टाळी देण्यासाठी हात दिल्याची भावना
मुद्दा – ४
ठाकरेंची एकजूट, मराठी लाट?
- दोन्ही ठाकरे एकत्र आले तर चमत्कार घडू शकतो
- शिवसैनिक, मनसैनिक उत्साहानं सळसळतील
- कुणी काहीही बोललं तरी मराठी माणसांसाठी ठाकरे हा जिव्हाळ्याचा विषय. ते जर एकत्र आले तर मराठी अस्मितेची लाट उसळू शकेल. दोन्ही पक्षांच्या अनेक नव्या तरुणांना, ज्येष्ठ सत्तावंचितांना नगरसेवकपदाची, कदाचित महापालिका सत्तेची संधी मिळू शकेल
मुद्दा – ५
- जर ठाकरे वेगळे लढलेत, एकेकटे लढले तर अर्थातच दोघंही कमजोर पडतील.
- दोघांनाही फटका बसेल. पण जर राज ठाकरे भाजपाकडे गेले तर त्यांचे काही निवडून येतील. पण एक नक्की राज ठाकरे या ब्रँडच्या ठाकरीपणाला धक्का बसेल.
- दूरगामी विचार करता त्यांचं नुकसान होऊ शकेल.
- त्या परिस्थितीत त्यांच्याकडे असलेला भाजपाविरोधी मन आणि मत असलेला मोठा वर्ग उद्धव ठाकरेंकडे जावू शकतो.
- त्यामुळे २०१४ च्या मोदी लाटेत विधानसभेला राज ठाकरे १३हून एकवर आलेले, तसं एकटं लढून होऊ शकेल.
- एकटं लढून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचंही नुकसानच होईल. पण जर मनसे भाजपासोबत गेली, उद्धव ठाकरे भाजपाविरोधात मविआसोबत लढले तर त्यांचा फायदा होऊ शकेल.
- ते भाजपाच्या पुरात वाहून जाण्याऐवजी मविआ समीकरणांच्या आधारे बळ दाखवून देऊ शकतील,
एकीकडे हे पाच मुद्दे, पाच समीकरणेच. एक आणखी मुद्दा. राणेंनी उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरेंचा उल्लेख चुकून केला किंवा ती त्यांची चूक झाली, असंही आहे. कारण त्यातून दोघेही विरोधात राहतील. अर्थात नेमकं काय होईल. प्रत्यक्षात निवडणूक आल्यावर कळेलच की ठाकरे काय करतात. तसे दोघंही ठाकरे हुशार आहेत. अनुभवी नेते आहेत. दोन अधिक दोन म्हणजे चार हे त्यांनाही कळतं आणि राजकारणाच्या गणितात दोन अधिक दोन चारच असतील, असंही नाही, हेही त्यांना कळतं. त्यामुळे आपल्या सोयीची वाटणारी समीकरणं जुळवत ते नेमकं काय करतात, ते येणारा काळच सांगेल. तोपर्यंत अंदाजाचे पंतग लॉजिकचा मांजा वापरत उडवत ठेवूया…आज शिवसेनेचा एक नेता माझ्याशी बोलताना म्हणाला तेही महत्वाचं. तो म्हणाला, एक मात्र नक्की…औकात काढणाऱ्यांना ठाकरे सोडत नसतात, हा आजवरचा इतिहास आहे…आता राणे बोलले तसं घडतं की ठाकरे राणेंना निवडणुकीत औकात दाखवतात ते कळेलच!