मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीनं आणि महापुरानं हादरवलं आहे. गेल्या काही वर्षात अचानक येणाऱ्या अशा महाआपत्ती वारंवार घडू लागल्या आहेत. त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तींना रोखण्यासाठी राज्य सरकारनं तातडीनं उपाययोजनेवर विचार सुरु केला आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये महाराष्ट्र महापुरांना रोखण्यासाठी सज्ज होईल. त्यासाठी खास जल आराखडा तयार करून पुराच्या पाण्याला रोखण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापूर आणि अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीनंतर ही घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील महाडच्या तळीये गावात जाऊन दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेत दगावलेल्या लोकांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. त्यांनी त्यांचं सांत्वन केलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्या सरकारने ठरवलेली उपाययोजना मांडली.
महाराष्ट्राचा महापूर रोखण्यासाठी जल आराखडा
• दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो.
• त्याचे प्रमाण आणि परिणाम आपण ठरवू शकत नाही.
• कुणीही ढगफुटीचा अंदाज वर्तवू शकत नाही.
• कोल्हापूर आणि सांगलीत प्रचंड पूर आला.
• धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग सुरु करावा लागला.
• त्यामुळे परिस्थिती गंभीर झाली होती.
• कोकणातही नेहमीच जोरदार पाऊस पडत असतो.
• त्यामुळे आता सरकार जल व्यवस्थापन करणार आहे.
• जल आराखडा तयार करणार आहोत.
• अतिवृष्टीमुळे अचानक पुराचे पाणी वाढते आणि होत्याचे नव्हते होते.
• अचानक मोठा पाऊस आणि अचानक महापूर हे आता नेहमीचे झाले आहे.
• त्यामुळेच हा जल आराखडा तयार करणार आहोत.

महाराष्ट्रातील महाड, चिपळूण, सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये पावसाळ्यात नेहमीच पुराचे पाणी भरते. त्याचे व्यवस्थापन झाले पाहिजे. अशा दुर्घटना होऊ नये आणि घटना घडल्या तर जीवितहानी होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी हे जल व्यवस्थापन करण्यात येणार आहे, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं.
डोंगराळ भागातील गावकऱ्यांचं पुनर्वसन
• डोंगराळ भागात राहणाऱ्यांचं पुनर्वसन करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
• गेल्या काही वर्षांपासून हा नेहमीचा अनुभव आहे.
• आक्रित म्हणावं असं विपरीत घडत आहे.
• पावसाळ्यात अनपेक्षित घटना घडत आहे.
• त्यामुळे त्यातून शहाणे होण्याची गरज आहे.
• गेल्या काही वर्षापासून चक्रीवादळानेच पावसाळा सुरू होत असल्याचं दिसून येत आहे.
• डोंगरदऱ्यात असलेल्या अनेक वस्त्यांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे.
• आम्ही फक्त पुनर्वसनाचा विचार करणार नाही. तर त्याचा व्यवस्थित आराखडा तयार करणार आहोत.

मुख्यमंत्र्यांचा दिलासा, तुम्ही स्वत:ला सावरा, सरकारवर सोडा!
• मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दरडग्रस्तांना दिलासा दिला.
• तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे.
• त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा.
• बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा.
• या दुर्घटनेत ज्यांचं नुकसान झालं आहे.
• त्यांचं सर्वांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे.
• त्यांची सर्व कागदपत्रे त्यांना मिळवून देण्यात येणार आहे.
• तुम्ही काळजी करू नका.
• सर्वांना मदत दिली जाईल.








Subscribe