मुक्तपीठ टीम
दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी चांगलेच हुशार आहेत. आंदोलनाची तीव्रता वाढत चालल्याने सरकारने शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी वादग्रस्त ठरलेले कृषि कायदे दीड वर्षे स्थगित करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, शेतकऱ्यांनी सरकारची क्लुप्ती ओळखत करायचेच असतील तर तीन वर्षे स्थगित करा, असं सांगत दीड वर्षांचा प्रस्ताव फेटाळला. दीड वर्षे उलटल्यानंतर सरकार कायदे आहे तसेच लागू करण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण तीन वर्षांनंतर २०२४ हे निवडणूक वर्ष असल्याने शेतकऱ्यांना दुखावणारे काही करणे सरकारला परवडणारे नसणार, त्यामुळेच शेतकऱ्यांनी कायदे तीन वर्षे स्थगितीची मागणी केली आहे. आज अकराव्या वेळी शेतकरी सरकारशी चर्चा करताना याच मुद्द्यावर भर देणार आहेत.
दिल्ली सीमेवरील कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनाचा आज ५८ वा दिवस आहे. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत बुधवारी सरकारने एक पाऊल मागे घेत दीड वर्षासाठी नव्या कृषी कायद्यांना स्थगित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यानंतर शेतकरी आंदोलक सरकारच्या प्रस्तावाशी सहमत होतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती, पण तसे झाले नाही.
गुरुवारी दिवसभर शेतकरी नेत्यांची बैठक झाली. रात्री उशिरा शेतकरी नेत्यांनी सरकारचा प्रस्ताव मान्य नसल्याचे सांगितले. शेतकरी नेते म्हणाले की, सरकारने कायदा रद्द करावा आणि किसान हमी दर मिळायलाच हवा.
आज शेतकरी नेत्यांची सरकारबरोबर ११ वी बैठक दुपारी २ वाजता होणार आहे. यात शेतकरी आंदोलक आपला निर्णय सरकारला सांगणार आहेत.
शेतकरी नेत्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पुढील तीन मागण्या ठरवण्यात आल्या:
1. सरकारने नवे कृषी कायदे ३ वर्ष स्थगित ठेवण्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करावे.
2. प्रति एकर शेती कर्जाची मर्यादा ५ लाखपर्यंत वाढवावी.
3. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी.
२६ जानेवारीला आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते आज सलग चौथ्या दिवशी दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांशी भेट घेणार आहेत. यापूर्वी तीन वेळा पोलिसांचा शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. गुरुवारी शेतकऱ्यांनी दिल्लीतील आउटर रिंग रोडवर ट्रॅक्टर परेड काढणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या या मागणीला मान्यता देण्यास पोलिसांनी नकार दिला. पोलिसांनी कुंडली-मानेसर-पलवल (केएमपी) द्रुतगती महामार्गावर परेड काढण्याचे आवाहन केले, पण शेतकर्यांचे ते पटले नाही.
तर दुसरीकडे पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी संघटना ट्रॅक्टर रॅलीच्या तयारीत व्यग्र आहेत. गुरुवारी पंजाबमधील फिरोजपूर, मोगा, फाजिल्का, जालंधर, मानसा आणि बठिंडा येथून सुमारे १ हजार ८३० ट्रॅक्टरसोबत तब्बल १३ हजार ९५० शेतकरी दिल्लीत रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातूनही शेतकरी आंदोलक, शेतकरी विधवा असे अनेक दिल्लीकडे निघाले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तिरंगा फटकवत एक लाखाहून अधिक ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे.