मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या बातम्या येतात त्या बहुतांशी भाजपाच्या नेत्यांना भेटल्याच्या किंवा संबंधित संस्थांच्या राजभवनवरील कार्यक्रमांच्या. आज मात्र वेगळी बातमी आली ती भाजपाविरोधी विचारांचे नेते राज्यपालांना भेटल्याची. त्यांनी राज्यपालांकडे मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधातील दहा लाख सह्यांचे निवेदन सोपवले. त्यातील तब्बल सहा लाख सह्या या महाराष्ट्रातून गोळा करण्यात आल्या आहेत.
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि शेती विरोधी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने देशभरात 10 लाख सहया गोळा करण्यात आल्या आहेत. त्यापैकी तब्बल सहा लाख सह्या फक्त महाराष्ट्रातून गोळा करण्यात आल्या. त्यांचे एक संयुक्त निवेदन आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना शेतकरी नेते राजू शेट्टी व प्रतिभा शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. त्यावेळी आमदार कपिल पाटील, राष्ट्र सेवा दलाचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे, नितिन मते, राजा कांदळकर, अबिद शेख, चंद्रकांत म्हात्रे, सचिन बनसोडे, रोहित ढाले यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषाशास्त्रज्ञ, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राभर 6 लाख 75 हजाराहून अधिक सह्यांची निवेदने स्थानिक तहसिलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना सेवा दल पदाधिकारी आणि समविचारी कार्यकर्त्यांनी दिली.
केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेले तीनही शेती विषयक कायदे शेतकरी विरोधी असून त्यातून देशातील शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत. या कायद्यांच्या विरोधात गेली तीन महिने राजधानी दिल्लीच्या सरहद्दीवर शेतकऱ्यांचे अभूतपूर्व अहिंसक आंदोलन सुरु आहे. त्याची दखल घेण्याऐवजी हे शेतकरी आंदोलन निर्दयपणे दडपण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शेती विरोधी तीनही कायदे ताबडतोब मागे घेण्याची मागणी करण्यासाठी ही सहयांची मोहीम घेण्यात आल्याची माहिती राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय महासचिव अतुल देशमुख यांनी दिली आहे.
राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश देवी यांचे पत्र
माणुसकीच्या मुशीत घडलेल्या महाराष्ट्रा नम्र वंदन – गणेश देवी
शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या माझ्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रातील शेकडो कार्यकर्त्यांनी गेले तीन आठवडे अविश्रांत पायपीट करून समर्थनाच्या सह्या गोळा केल्या.
ह्यात राष्ट्र सेवा दल, छात्रभारती, शिक्षकभारती, स्वाभिमानी शेतकरी संघटन, लोकसंघर्ष मोर्चा, एनएपीएम, एस एम जोशी सोशालिस्ट फौंडेशन, विविध शेतकरी संघटना, श्रमिक संघटना, महाराष्ट्र सोशल फोरम, हमाल पंचायत, दक्षिणायन, साहित्यिक, कलाकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते सारे-सारे संवेदनशील प्रागतिक विचाराचे स्त्री-पुरुष सामील झाले.
पाहता-पाहता गोळा होणाऱ्या सह्यांचा आकडा ५ लाखाची संख्या ओलांडून गेला.ह्यातून स्पष्ट झाले ते संपूर्ण महाराष्ट्राचे नैतिक साहस आणि शेतकऱ्यांच्या विषयीची अथांग आपुलकी.
त्यासाठी आभार तरी कोणाचे आणि कसे मानायचे?
माणुसकीच्या मुशीत घडलेल्या महाराष्ट्रा नम्र वंदन.
आज ह्या सही-मोहिमेचे निवेदन मा. राज्यपालांना पोहचवण्यात आले. त्यांनी त्यासाठीच्या मुलाखतीची वेळ दिली होती.
मी स्वतः प्रकृतीच्या कारणाने प्रवास करू शकलो नाही. आ. कपिल पाटील यांच्या पुढाकारात महाराष्ट्रातील आणि सेवादलातील जेष्ठ सामाजिक नेत्यांचे शिष्ट मंडळ त्यांना भेटले.
शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी, प्रतिभा शिंदे, अर्जुन कोकाटे, नितीन मते, चंद्रकांत म्हात्रे, राजा कांदळकर, सचिन बनसोडे, रोहित ढाले हे ह्या मोहिमेत आणि भेटीत सहभागी झाले हे विशेष.
बुलंद आणि एक आवाजात संपूर्ण महाराष्ट्र बोललोय, “शेतीविषयीचे ते तीन कायदे मागे घ्या.” या आवाजात ज्यांचे स्वर मिसळले त्या परिचयाच्या आणि अपिरिचित प्रत्येकाला माझा सलाम.
गणेश देवी
राष्ट्रीय अध्यक्ष
राष्ट्र सेवा दल