मनिषा पाटील
कोरोना संकटानंतर आरोग्यविषयक एक जागरुकता आपोआपच वाढली. त्यातूनच मग शरीर निरोगी असावं, यासाठी प्रयत्न केले जाऊ लागले. तसेच रोगप्रतिकार शक्तीचं महत्व ओळखून ती वाढवण्यासाठी प्रयत्न वाढलेत. त्यातूनच मग रसायनमुक्त सेंद्रिय शेतीबद्दलही आकर्षण वाढलं. ही सेंद्रिय शेती आपल्या घरीच कशी करता येईल, ते कोल्हापूरच्या मनिषा पाटील यांनी सोप्या शब्दात समजवलं आहे.
आजच्या घडीला सेंद्रिय अन्न खाणं काळाची गरज आहे. तरी सगळं स्वत: पिकवून खाणं कुणालाच शक्य नाही. पण आवड, वेळ असेल तर गच्चीवर भाजीपाला करून पूर्णतः नैसर्गिकपणे पिकलेलं थोडं आरोग्यदायी अन्न खाता येतं व स्वतः पिकवून खाल्ल्याचं वेगळंच समाधान मिळतं.
टेरेस गार्डन करायचं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेरेस वाॅटरप्रूफींग केलेलं हवं. नाही तर स्लॅबला गळती लागण्याची शक्यता असते.
शिवाय टेरेसवर स्वच्छ आणि भरपूर सूर्यप्रकाश दिवसातील ७-८ तास येत असावा.
अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेरेसवर माकडं येत नसावीत.जर येत असतील तर काही 👇 pic.twitter.com/SbXJBpzDh3
— मनिषा (@manisha27_m) April 5, 2022
प्राथमिक आवश्यकता
- गच्चीवर बाग करायची तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गच्ची वॉटरप्रूफींग केलेलं हवं. नाही तर स्लॅबला गळती लागण्याची शक्यता असते.
- शिवाय गच्चीवर स्वच्छ आणि भरपूर सूर्यप्रकाश दिवसातील ७-८ तास येत असावा.
- अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गच्चीवर माकडं येत नसावीत. जर येत असतील तर काही ठराविकच भाज्या, फुले लावता येतील जी माकडं खात नाहीत.
- इतर भाज्या लावल्या तर माकडं नासधूस करून सगळी मेहनत वाया घालवतात.किंवा जाळी लावून बाग बंदिस्त करावी लागेल.
- सर्वात महत्त्वाचं म्हणजे आवड हवी तसेच रोज किमान एक तास बागेसाठी वेळ द्यायला हवा.
मी जेव्हा बागेची सुरूवात केली तेव्हा सिंमेंटची रिकामी पोती धुवून वापरली होती पण ती लगेच खराब होतात.
रंगांचे रिकामे डबे कमी किंमतीत मिळतात ते वापरता येतात.
मातीच्या सिंमेंटच्या कुंड्या वापरल्या तर त्यांना लवकरच तडे जातात शिवाय वजनाला जड सुध्दा असतात. pic.twitter.com/QnsGr1jOw0
— मनिषा (@manisha27_m) April 5, 2022
गच्चीवर बाग कशी लावावी?
- मी जेव्हा बागेची सुरूवात केली तेव्हा सिंमेंटची रिकामी पोती धुवून वापरली होती पण ती लगेच खराब होतात.
- रंगांचे रिकामे डबे कमी किंमतीत मिळतात ते वापरता येतात.
- मातीच्या सिंमेंटच्या कुंड्या वापरल्या तर त्यांना लवकरच तडे जातात शिवाय वजनाला जड सुध्दा असतात.
- प्लॅस्टिकच्या कुंड्या जास्त टिकतात(६-८वर्षे) वजनाने हलक्या असतात इकडे तिकडे उचलून ठेवायला सोप्या जातात पण महाग असतात.
- कायम स्वरुपी करायचं असेल तर वीटा सिमेंट मध्ये बांधीव वाफे तयार केले तरी चालतात.
- कमी बजेटमध्ये करायचे तर रंगांचे डबे उत्तम पर्याय आहे. ४ वर्षे टिकू शकतात.
- डबे वापरताना एक महत्त्वाची गोष्ट आधी करावी लागते ती म्हणजे जास्तीच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी डब्याच्या तळात दोन आणि तळाच्या वर लगेचच बाजूला दोन ते तीन छिद्रे अगदी व्यवस्थितपणे पाडून घ्यावी लागतात. मातीत पाणी साठून नाही राहिले पाहिजे.
किंवा सुरुवातीला प्रयोग म्हणून धान्याची ३० किलोची रिकामी पोती असतात ती वापरता येतील. तीन ते चार महिने टिकतात.
माती कोणती?
- बागेसाठी माती वापरताना तांबडी मातीच घ्यावी. काळी चिकणमाती नको कारण त्यातून पाण्याचा हवा तसा निचरा होत नाही.
- कुंडीतील माती वाळली तरी टणक व्हायला नको भुसभुशीत रहावी.
- कुंडीमध्ये माती भरायच्या आधी त्यात खते मिसळून तयार करून घ्यावी लागते. ६०% माती+१०% कोकोपीट+३०% खते (शेणखत,
- कंपोस्ट खत, गांडूळ खत जशी उपलब्ध होतील त्याप्रमाणे) या प्रमाणात घेतले तर चालते.
खत तयार होतं आणि त्याच पोषक तत्त्वांवर झाडे नैसर्गिकपणे वाढतात त्याच प्रकारे मी भाज्या वाढवते.
बागेतील पालापाचोळा कचरा गोळा करून त्याचं कंपोस्ट खत व कंपोस्ट टी तयार करते. (पालापाचोळा कुजल्यानंतर त्याचं जे काळं पाणी तयार होतं त्याला कंपोस्ट टी म्हणतात)👇 pic.twitter.com/CVHAd6IgGx
— मनिषा (@manisha27_m) April 5, 2022
प्रकाश – पाणी किती आणि कसे?
- सुर्यप्रकाशाचा विचार करायचा झाला तर फळभाज्यांना साधारण ६-७ तास सुर्यप्रकाशाची गरज असते तर पालेभाज्यांना ३-४ तास मिळाला तरी पुरेसा असतो.
- बागेला पाणी देताना नेहमी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी पाच नंतर पाणी द्यायचे. तसेच प्रत्येक रोपांची पाण्याची गरज वेगवेगळी असते. ऋतूंप्रमाणे सुध्दा पाण्याची गरज बदलत राहते.
- ती ओळखून पाणी द्यावे लागते. उदा. वांगी, टोमॅटोची रोपे लहान असताना त्यांना दिवसातून एकदा किंवा दोन दिवसांतून एकदा पाणी द्यावे लागते पण ती मोठी होऊन फळं येऊ लागली की दिवसातून दोनदा पाणी द्यावे लागते. झाडाच्या प्रकारानुसार सुध्दा पाणी कमी जास्त लागते. जसं की लिंबू, मिरची यांना कमी तर कोबी, फ्लॉवर, वांगी, टोमॅटो यांना जास्त पाणी लागते.
गच्चीवरील बागेसाठी खतं कोणतेँ?
- मी गेली १० वर्षे गच्चीवर भाजीपाला पिकवतेय पण आजपर्यंत बागेला कधीच बाजारातून आणून रासायनिक खते मायक्रोन्युट्रीअंटस् दिली नाहीत.
- जंगलात जसं वाळलेला पालापाचोळा भिजुन कुजून खत तयार होतं आणि त्याच पोषक तत्त्वांवर झाडे नैसर्गिकपणे वाढतात त्याच प्रकारे मी भाज्या वाढवते.
- बागेतील पालापाचोळा कचरा गोळा करून त्याचं कंपोस्ट खत व कंपोस्ट टी तयार करते. (पालापाचोळा कुजल्यानंतर त्याचं जे काळं पाणी तयार होतं त्याला कंपोस्ट टी म्हणतात.)
- उन्हाळ्यात किमान १५ दिवस माती वाळवणं गरजेचं असतं त्यामुळे मुळांना बुरशीजन्य रोगाची लागण कमी होते.
- माझं खत देण्याचं प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.. वर्षातून एकदा उन्हाळ्यात माती वाळवल्या नंतर त्यात शेणखत मिक्स करायचे.
- कंपोस्ट खत वर्षभर जसं तयार होईल तसं देत रहायचं आणि कंपोस्ट टी चार दिवसांतून एकदा प्रत्येक झाडाला २०० मिली देत रहायचं.
बागेची काळजी कशी घ्यावी?
गच्चीवर आजूबाजूचा संसर्ग होत नसल्याने रोग, किडी शेताच्या तुलनेत तशा कमी प्रमाणात येतात पण हवामानातील बदल, अति थंड, अति उष्ण, अति पाऊस, धुकं, ढगाळ वातावरण या सर्वांचा परिणाम शेतीप्रमाणे कधी कधी इथेही होतोच. त्यावर उपाय म्हणून बाजारात नीम ऑईल मिळतं ते वापरता येतं किंवा अजून एक उपाय करता येतो. एखाद्या रोपावर, फांदीवर किंवा पानावर रोग किड दिसली की ती इतरत्र पसरण्या आधी ते पान, रोप, फांदी काढून नष्ट करून टाकणे.
बियाणे कोणती वापरावी?
- बिया घेताना शक्यतो स्थानिक शेती दुकानातून खात्रीने घ्याव्यात.
- त्यांची उत्पादन क्षमता व रोगप्रतिकारक क्षमता चांगली असते.
गच्ची गार्डन मध्ये अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्या भाज्या कधी आणि किती प्रमाणात लावाव्यात?
- हल्ली बऱ्याच भाज्या सगळ्या सिझन मध्ये येत असल्या तरीसुद्धा मुळ सिझन मध्ये त्यांचं उत्पन्न व दर्जा दोन्ही चांगलं असतं.
म्हणून शक्यतो सिझनल भाज्या जास्त लावाव्यात. - आपल्या कुटुंबाला कोणत्या भाजीची किती गरज आहे ते बघुन त्यानुसारच लावाव्यात कारण गच्ची वर जागा मर्यादितच असणार.. तेवढ्यात आपली जास्तीत जास्त प्रकारांची गरज भागली पाहिजे. एकच जास्त लावली तर इतर प्रकार लावता येणार नाहीत.
- शेवटी गच्चीवरील बाग किंवा किचन गार्डन हे सुद्धा निसर्गाचंच एक वेगळं रूप आहे. आपण योग्य निगा राखली तर ती भरभरून परतावा देते.
(कोल्हापूरच्या मनिषा पाटील यांचा समाजमाध्यमांच्या माध्यमातून उपयोगी माहिती देण्याचा प्रयत्न असतो. गच्चीवरील किंवा अंगणातील बागकाम त्यांच्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय आहे.)
ट्विटर @manisha27_m








Subscribe