मुक्तपीठ टीम
२६ जानेवारीच्या किसान परेडमध्ये सहभागी होण्यासाठी विदर्भातील शेकडो शेतकरी विधवा व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्य आज यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथून “किसान बचाव यात्रा ” काढून निघाले आहेत. किसान यात्रा मध्यप्रदेश उत्तर प्रदेश मधून प्रवास करीत दिल्ली येथे पोहचणार आहे . या शेतकरी विधवा सर्व दिल्लीच्या सीमेवर भेट देऊन आपल्या व्यथा मांडतील. “जर पंतप्रधान, कृषिमंत्री यांनी वेळ दिला तर आम्ही त्यांची भेट घेणार,” अशी माहिती भारती पवार यांनी दिली.
किसान यात्रेला हिरवी झेंडा दाखवितांना संयोजक किशोर तिवारी म्हणाले कि “ज्या कृषी सुधारणांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी व कृषी संकटावर २००६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी विषेय पॅकेज देऊन सुरुवात केली होती. त्यानंतर खाजगी बाजार समिती शेतकऱ्यांना खुल्या बाजारात मुभा, भंडारणं क्षमता नियंत्रण समाप्त करणे, कार्पोरेट शेती यांचे प्रयोग २०११मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागू केले होते. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्त्पन्न दुपट्ट तर सोडा अजून कमी झाले. त्यामुळेच महाराष्ट्रात २०१७ व २०१९ मध्ये अशी दोनवेळा ऐतिहासिक कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यावी लागली. हे सत्य समोर असतांना त्याच सुधारणा उत्त्पन्न दुपट्ट करण्याचा नावावर करणे चुकीचे आहे. आंदोलन सरकारच्या अंगलट आल्यावरही अट्टाहास करणे अनुचित आहे, आता मोदी सरकारने कृषी कायदे रद्दच करावेत.”.
विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या अध्यक्षा अपर्णा मालीकर यावेळी म्हणाल्या कि ‘ भारतातील सध्याची शेतीविषयक संकट ही दोन घटकांची निर्मिती आहे: घटते उत्पन्न ओळखणे आणि अपयशी ठरलेले राज्य अपयश; आणि अनुदान मागे घेण्याचा आर्थिक परिणाम यामुळे खोलवर रुजलेली शेती संकटाची मुळे , मातीची सुपीकता कमी होत जाणे, पाण्याची पातळी कमी होणे , लागवडीची वाढती किंमत आणि शेतकर्यांना पिकांचा नफा परतावा, वेळोवेळी निविष्ठांमधील असमाधानकारक वाढ आणि मागणीपेक्षाजास्त अतिरिक्त उत्पादन, सदोष आयातीच्या धोरणांमुळे ओढवणारे कृषी संकट हे सारे मानवनिर्मित असतांना आपले नियोजन कोणासाठी असा सवाल त्यांनी केला .
या किसान बचाव यात्रेचे नेतृत्व शेतकरी विधवा अपर्णा मालीकर ,रेखा गुरनुले ,शोभा वाघाडे ,भारती पवार ,शीला मांडवगडे ,अंजूबाई भुसारी ,आदीवासी नेते अंकित नैताम ,गजाननराव आष्टेकर ,निलेश जैस्वाल ,रवीभाऊ कुर्हेवार करीत आहेत .अशी माहीती या किसान यात्रेचे संयोजक शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी दिली . ग्रँड मराठा फौंडेशन अध्यक्ष रोहीत शेलटकर यांच्या सहकार्याने या किसान बचाव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे .
….तोपर्यंत शेतकऱ्यांचे उत्त्पन्न वाढणार नाही! – किशोर तिवारी
- सरकारने लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी खत रासायनिक सर्व प्रकारचे औषधी ,शेतीमधील सर्व प्रकारची मजुरी यावरील अनुदान सुरु करावे
- शेतीमाल हमी भावात शेतकऱ्यांच्या दारावर विकला जावा
- मरणासन जमिनीचे पुनर्जीवन करावे
- गावामध्ये भंडारणं व्यवस्था ,प्रक्रिया व्यवस्था ,विपणन व्यवस्था निर्माण करावी
- शेती लागणारा पतपुरवठा सरकारी बँकांनी पंचवार्षिक तत्वावर द्यावा
- त्याच बरोबर शेतकऱ्यांचे जागतिक पर्यावरण बदल याला धरून हित जपणारी पीकविमा व्यवस्था सुरु करण्यात यावी
- या बरोबरच देशाच्या १४० कोटी जनतेला लागणारी सर्व डाळी ,सर्व प्रकारचे तेल ,अन्न व जनतेला आव्यश्यक असलेला शेतात निर्माण होणाऱ्या सर्व कृषीमाल याची आयात बंदी करण्यात यावी